जळगाव : देशातील गरीब, आदिवासी आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पौष्टिक फळे अधिक सुलभ व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय “फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाच्या तीन दिवसीय नियोजन कार्यशाळेचा शुभारंभ १६ जून रोजी जैन हिल्स येथील परिश्रम सभागृहात झाला होता. त्यात तज्ज्ञांनी विचारमंथन केले व काही महत्त्वाच्या गोष्टींचा उहापोह केला. या कार्यक्रमाचा समारोप १८ रोजी झाला.
या कार्यशाळेचे उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी फलोत्पादन विभागाचे माजी उपमहासंचालक तथा सीएचएआय (CHAI) चे संस्थापक अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंह, अलायन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी इंटरनॅशनल अँड सीआयएटीचे जागतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. ख्रिस केटल, भारत प्रतिनिधी डॉ. जे. सी. राणा आणि तांत्रिक सल्लागार डॉ. प्रेम माथुर, डॉ. अनिल ढाके, डॉ. के.बी. पाटील, डॉ. बी.के आदी उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेचे मुख्यालय इटलीतील रोम येथे आहे. या कार्यशाळेत दहा राज्यांतील भागीदार संस्था, आयसीएआरच्या संशोधन संस्थांतील, राज्य कृषी विद्यापीठांतील आणि स्वयंसेवी संस्थांतील सुमारे ४० शास्त्रज्ञ, संशोधक तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रेम माथुर म्हणाले की, भारताने अन्नसुरक्षेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असली तरी पोषणसुरक्षा अजूनही मोठे आव्हान आहे. कुपोषणाचा परिणाम गरीब, आदिवासी आणि वंचित समाजघटकांवर होत असल्याने स्थानिक आणि पारंपरिक पौष्टिक फळ प्रजातींच्या उत्पादन व वापराला प्रोत्साहन देणे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
अमेरिकास्थित समाजसेवी डॉ. उमेश माहेश्वरी यांच्या आर्थिक सहाय्याने हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत आवळा, जांभूळ, पेरू, सीताफळ, फालसा, बोर, करवंद, लिची, लिंबू आणि संत्री-मोसंबी यांसारख्या विविध पौष्टिक फळांच्या लागवडीला आणि वापराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात येणारी, कमी खर्चाची आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहणारी फळपिके ओळखून त्यांचा प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच वर्षभर पौष्टिक फळांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जाईल.
देशातील अल्पभूधारक आणि संसाधन-अभावी शेतकऱ्यांना अनेकदा अप्रमाणित स्रोतांकडून निकृष्ट दर्जाची रोपे खरेदी केल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे रोग व कीडमुक्त, उच्च दर्जाची आणि लवकर फळधारणा करणारी लागवड सामग्री उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. यासाठी आयसीएआर संस्था, कृषी विद्यापीठे, शासकीय यंत्रणा आणि खासगी क्षेत्र यांच्या सहकार्याने प्रमाणित लागवड सामग्रीची उपलब्धता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील पाच ते सहा वर्षांत हा प्रकल्प विविध राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सहभागी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी जैन इरिगेशनच्या संशोधन व उत्पादन सुविधांना भेट दिली. त्यांनी केळी, डाळिंब, आंबा आणि इतर फळपिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाची, दर्जेदार रोप उत्पादन प्रणालीची तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची पाहणी केली. लाखो शेतकऱ्यांना दर्जेदार लागवड सामग्री पुरवून उत्पादनक्षमता आणि उत्पन्न वाढविण्यात जैन इरिगेशनने दिलेल्या योगदानाचे सहभागी तज्ज्ञांनी कौतुक केले.
कार्यशाळेत प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीच्या रणनीती, परवडणाऱ्या दरात दर्जेदार लागवड सामग्री उपलब्ध करून देणे, हवामान-प्रतिरोधक फळपिकांचा प्रसार आणि वंचित समाजघटकांमध्ये पोषणसुरक्षा बळकट करणे यावर विशेष चर्चा होत आहे. या उपक्रमामुळे देशातील शाश्वत शेती, पोषणमूल्यवृद्धी आणि शेतकरी कल्याणाला नवी चालना मिळेल, असा विश्वास सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केला. समारोपप्रसंगी सहभागी संस्थांनी गरीब व वंचित समुदायांना पौष्टिक फळांची उपलब्धता वाढविणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या उदार आर्थिक सहाय्याबद्दल डॉ. उमेश माहेश्वरी यांचे आभार मानले.
जैन इरिगेशनच्या वतीने ‘फ्रुट फुल इंडिया’ उपक्रमांतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना आंबा, मोसंबी, संत्री, डाळिंब, स्ट्रॉबेरी, पेरू, नारळ, पपई यांसारख्या उच्च गुणवत्तेच्या फळांच्या रोपांचा तसेच ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा पुरवठा करणे शक्य आहे. सीएफआय व बायो डायव्हर्सिटी इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचे प्रशिक्षण जैन हिल्स येथे घेता येऊ शकते. गुणवत्तापूर्ण व अनुवंशिक शुद्धतेची रोपे मिळाल्याने ग्रामीण भागात फळ उत्पादन वाढेल, पोषण सुरक्षा निर्माण होईल व सुदृढ पिढी घडेल, असे प्रतिपादन सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली येथील फलोत्पादन विभागाचे माजी उपमहासंचालक डॉ. एच.पी. सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, उच्च गुणवत्तेचे प्लांटिंग मटेरियल पुरवण्यात जैन इरिगेशनला मोठा अनुभव आहे. केळीच्या टिशू कल्चर रोपांपासून स्वीट ऑरेंज, स्ट्रॉबेरी, आंबा इत्यादी रोपांची प्रायमरी व सेकंडरी हार्डनिंग करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण रोपे पुरवण्याच्या त्यांच्या कार्यामुळे या उपक्रमाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.