अमळनेर : अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी शुक्रवारी दुर्घटनास्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाला तातडीने मदतकार्य व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.
पाहणीनंतर त्यांनी सांगितले की, संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा व तालुका प्रशासनाला युद्धपातळीवर आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी प्रशासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत आणि पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, संत सखाराम महाराज वाडी संस्थानचा वैभवशाली वारसा जतन करण्यासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल आणि हे पवित्र श्रद्धास्थान पूर्ववत उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.