जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाने खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगर विभागात राबविलेल्या मोतीबिंदू निर्मूलन अभियानाने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. सन २००८ ते २०२६ या कालावधीत तब्बल ६१ हजार २२९ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून हजारो गरजू रुग्णांना नवदृष्टी देण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट उगवली आहे.
मोतीबिंदू निर्मूलन अभियानाच्या यशामध्ये डॉ. एन. एस. आर्विकर व डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. नितू पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. अश्विनी काकडे तसेच सबा शेख, प्रतिक्षा सुटे, तृप्ती भोयरकर, स्वाती खरे, खुशी कांबळे आणि संजय महाजन यांनी मोलाचे योगदान दिले.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हे अभियान दुर्गम आणि ग्रामीण भागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले आहे. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर आणि दिवंगत श्रीमती गोदावरी आजी यांच्या सेवाभाव, करुणा आणि समाजसेवेच्या प्रेरणेतून हे अभियान सुरू झाले असून, एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी भविष्यातही हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानात सहभागी डॉक्टरांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. पहाटे ५ वाजल्यापासून शस्त्रक्रियांना सुरुवात करून सकाळी ९ वाजेपर्यंत शस्त्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे डॉक्टर शिबिराच्या गावात जाऊन दुपारी २ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करतात. या सातत्यपूर्ण सेवेमुळे हजारो रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत.
वर्षनिहाय शस्त्रक्रिया
- २००८ ते २०११ : ८,२१३ शस्त्रक्रिया
- २०१२ ते २०२६ : ५३,०१६ शस्त्रक्रिया
- एकूण : ६१,२२९ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
“मनाचा निश्चय केला की सर्व काही शक्य होते, याची प्रचिती या अभियानातून आली. पहाटे ५ वाजल्यापासून शस्त्रक्रिया करून सकाळी शिबिराच्या गावात जाऊन दुपारपर्यंत रुग्णांची तपासणी केली जाते. गरजू रुग्णांना दृष्टी मिळवून देण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”
– डॉ. नितू पाटील, समन्वयक, मोतीबिंदू शिबिर