लोणावळा : लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणात फिरायला गेलेल्या दोन मित्रांचा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी पर्यटनासाठी आलेल्या काही हौशी तरुणांनी धरणाच्या डोंगरकडील भागात पोहण्याचा प्रयत्न केला असता ही दुर्घटना घडली.
सध्या पावसाळा सुरू झाल्याचे संकेत असले तरी भुशी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. तरीही मोठ्या संख्येने पर्यटकांनी रविवारी धरण परिसरात गर्दी केली होती. यावेळी काही तरुण जलाशयाच्या खोल भागात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याची खोली व प्रवाह याचा अंदाज न आल्याने दोन तरुण अचानक बुडाले.
दुर्घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलीस निरीक्षक सुहास जगताप आणि त्यांच्या पथकासह शिवदुर्ग रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पाणबुडीच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. सायंकाळी चार वाजेपासून सव्वाचारच्या दरम्यान दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या रेस्क्यू मोहिमेत शिवदुर्ग पथकातील महेश मसणे, सचिन गायकवाड, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, श्याम वाल्मीक, महादेव भवर, राजेंद्र कडू, अनिल आंद्रे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
जीव गमावणारा ‘अतिउत्साह’
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा व मावळ परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, काही पर्यटकांचा अति उत्साह आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतात. मागील वर्षीही अशाच एका धबधब्यात काही पर्यटकांचा जीव गेला होता. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही नियम पाळण्याकडे दुर्लक्ष केल्यास अशा घटना टाळणे कठीण होत आहे.