राज्यात १३ जूनपासून मान्सून पुन्हा जोमात; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

पुणे : राज्यात १३ जूनपासून मान्सून सक्रिय होणार असून, त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यासोबतच १० जूनपासूनच काही भागांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ तर काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

हवेचा दाब घटल्याने मान्सूनला गती

गेल्या काही दिवसांपासून १०१० हेक्टापास्कल इतका स्थिर असलेला हवेचा दाब आता घटून १००० हेक्टापास्कलपर्यंत कमी होणार आहे. या बदलामुळे मान्सूनला गती मिळून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

१२ ते १५ जून दरम्यान वाऱ्याचा वेग वाढणार

विभाग वाऱ्याचा अंदाजित वेग कालावधी
कोकण ५० ते ७० किमी/ताशी १२ ते १५ जून
मराठवाडा ४० ते ५० किमी/ताशी १२ ते १५ जून
मध्य महाराष्ट्र ५० ते ६० किमी/ताशी १२ ते १४ जून

वाऱ्यांच्या वेगासोबतच विजांचा कडकडाट आणि जोरदार सरी यांची शक्यता असून, किनारपट्टी भागांमध्ये याचा अधिक प्रभाव दिसून येणार आहे.

अलर्ट यादी: कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

ऑरेंज अलर्ट (१३ जून):

  • कोल्हापूर व कोल्हापूर घाटमाथा
  • सिंधुदुर्ग

यलो अलर्ट (१० ते १३ जून दरम्यान):

  • पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव
  • रत्नागिरी, ठाणे, रायगड, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, बुलडाणा, भंडारा

मान्सून पुन्हा ‘फॉर्म’मध्ये येतोय

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मते, सध्या कमी दाबाचा पट्टा मजबूत होत असून अंदमान-निकोबार द्वीपसमूहातून पुन्हा वेगाने वारे राज्याच्या दिशेने सरकू लागले आहेत. त्यामुळे १३ ते १५ जून दरम्यान राज्यभर मान्सून जोरात सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • राज्य
Comments (0)
Add Comment