जग बदलतंय, उठा आपल्या स्वप्नांना कष्टाचे बळ द्या : प्राचार्या सोनल तिवारी

जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात विध्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न ; विविध बौद्धिक खेळांचे आयोजन

जळगाव : प्रतिनिधी
महविद्यालयात विद्यार्थ्यांना घडविले जाते. त्यांच्यावर योग्य ते संस्कार घालण्याचे प्रामाणिक प्रयत्न प्राध्यापक करीत असतात. त्यासोबतच विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, रोजगारभिमुक अभ्यास याचेही उत्तम ज्ञान आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे. ज्या विषयात शिक्षण घेत आहोत त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान विकसित करा. शिक्षण घेत असतांना प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो. आपण इतरांना फसवू शकतो परंतु स्वत:ला फसवू शकत नाही, त्यामुळे जीवनात सकारात्मकता, सत्यता, प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे नेहमी लक्षात ठेवा असे मत प्राचार्या सोनल तिवारी यांनी व्यक्त केले. नुकताच जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षा करिता अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विध्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला. आपल्या मनोगतात पुढे बोलताना प्राचार्या तिवारी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता, आत्मविश्वास, मेहनत करून वेळेवर योग्य निर्णय घ्यावेत. यामुळे तुमच्या यशाचे मार्ग नेहमी खुले राहतील. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, संगणक सुविधा, कौशल्य विकास कार्यशाळा, उत्कृष्ठ ग्रंथालय, संगीत, नृत्य, कला, हॉबी क्लब, जीम, बस सेवा आदी सोई सुविधांसोबत अभ्यासाकरिता अनुकूल असा परिसर आहे. यासोबतच या शैक्षणिक वर्षाची अभ्यासक्रम रूपरेषाही त्यांनी सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी आपला अमुल्य वेळ सोशल साधनांचा वापर करण्यात जास्त घालवू नये, सोशल मीडिया दररोज फक्त एक तास वापर करा आणि उर्वरित वेळ तुमच्या अध्यासासाठी द्या, अकरावी आणि बारावी हे तुमच्या पुढील शिक्षणाचा पाया आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून चांगली मेहनत करा तेव्हाच तुमचे उज्वल भविष्य घडू शकेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच प्रा. राहुल त्रिवेदी यांनी विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा घेत विविध प्रकारचे बौद्धिक खेळ आयोजित करून त्यांना उत्साहित केले. विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात पहिलाच दिवस असल्याने त्यांची सुरुवात आनंदीमय व्हावी. त्यासाठी प्राध्यापकांचा परिचय व विद्यार्थ्यांमधील आपसात परिचय करून घेण्यासाठी गमतीशीर पद्धतीचे खेळ घेण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. संदीप पाटील, प्रा. शितल किनगे, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. प्रियंका मल, प्रा. राहुल यादव, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. नयना चौधरी , प्रा. निकिता वालेचा , प्रा. नेहा लुनिया , प्रा. शिवानी देशमुख, अनिल सोनार, संतोष मिसाळ यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment