अंगावर ट्रॅक्टर घातल्याने तरूणाचा मृत्‍यू, नातेवाईकांनी मृतदेह घेवून तहसील कार्यालय गाठलं

अमळनेर : तरूणाच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (Jaywant Yashwant Koli)  (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ही घटना घडली. अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रार केल्याने त्यातून ही हत्या झाल्याची तालुक्यात चर्चा असून, हा घात की अपघात याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेतील दोषींवर कारवाई करावी याबाबत आज नातेवाईकांनी मयत शेतकऱ्याचा मृतदेह थेट अमळनेर तहसील कार्यालयात नेल्याने खळबळ उडाली. 

मांडळ येथे भाल्या नाला परिसरात शेती असलेले जयवंत यशवंत कोळी (Jaywant Yashwant Koli) (वय ३६) हे रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती एकाने कळवली. यानंतर नातेवाईक आणि इतर लोकांनी प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे उपचारसाठी नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे नेल्यावर थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाले होते. तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंतचा जीव गेल्याची तालुक्यात चर्चा आहे.

बातमी शेअर करा !
#jalgaon#JALGAON NEWSaccidentAmalnerAmalner newsCrime NewsJalgaon News Update
Comments (0)
Add Comment