इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 3 जणांचा मृत्यू
पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा 30 वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोसळला. या लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. एकाचवेळी इतका मोठा भार या पुला पेलवला नाही, ज्यामुळे तो कोसळला. या भीषण दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेमधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला असून त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले आहेत.
जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा (ता. मावळ) येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारादरम्यान 3 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास पूल अचानक कोसळला. या वेळी अनेक पर्यटक आणि काही लहान मुले पुलावर उपस्थित होती. पूल कोसळताच अनेकजण थेट नदीत पडले आणि जोरदार प्रवाहात वाहून गेले. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळी पिंपरी-चिंचवड पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन दाखल झाले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.