कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास
रावेर : तालुक्यातील पाल गावातील एका कृषी केंद्रात भरदिवसा चोरीची घटना घडली असून तीन अज्ञात इसमांनी संगनमताने काउंटरमधील ड्रॉवरमधून ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, ५ मार्च रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाल गावातील गणेश मानसिंग पवार (वय ३३) यांचे ‘दिक्षा कृषी केंद्र’ नावाचे दुकान आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता तीन अनोळखी इसम त्यांच्या दुकानात आले. त्यांनी बोलण्यात गुंतवून फिर्यादी गणेश पवार यांचे लक्ष दुसरीकडे वळवले.

या संधीचा फायदा घेत आरोपींपैकी एकाने काउंटरमधील ड्रॉवर उघडून त्यात ठेवलेल्या एक लाख रुपयांच्या रकमेपैकी ५० हजार रुपये चोरून नेले. काही वेळानंतर ही बाब लक्षात येताच गणेश पवार यांनी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जगदीश पाटील करीत आहेत.