राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे पोरक्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता सुनेत्रा पवारांच्या रूपाने नवे आणि खंबीर नेतृत्व मिळाले आहे. या निवडीमुळे पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थितांना संबोधित केले. अजित दादांच्या आठवणींना उजाळा देताना पटेल अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले, “अजित दादांच्या अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लढवले गेले. पक्षाच्या भवितव्याबाबत आणि नेतृत्वाबाबत अनेक कयास लावले जात होते. मात्र, मी पूर्ण जबाबदारीने सांगतो की, पक्षाच्या एकाही नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या मनात नेतृत्वाबाबत कोणताही ‘दुसरा विचार’ आला नाही. सुनेत्रा वहिनीच या पदासाठी योग्य आहेत, यावर सर्वांचे एकमत होते.”

सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्री म्हणून प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली आहे. आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. आगामी निवडणुका आणि राजकीय पेचप्रसंग हाताळताना सुनेत्रा पवार कशा प्रकारे नेतृत्व करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजित दादांचा वारसा पुढे नेत असतानाच, पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्याचे मोठे आव्हान आता सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे. या निवडीनंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला असून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.