DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्परतेने २१ वर्षीय तरुणाला नवजीवन

जळगाव : जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केलेल्या २१ वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना यश आले असून, त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे हा तरुण मृत्यूच्या दारातून परतला आहे. ही घटना केवळ वैद्यकीय कौशल्याचीच नव्हे तर कुटुंबीयांच्या सतर्कतेचीही जाणीव करून देणारी ठरली आहे.
याबाबत माहिती अशी की, सावदा येथील भूषण पाटील (वय २१) या तरुणाला गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मद्यपानाची सवय लागली होती. कालांतराने त्याच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो घरच्यांशी संवाद टाळू लागला, एकट्याने राहण्याची सवय त्याला लागली आणि मानसिक तणाव वाढत गेला. या परिस्थितीत त्याने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच त्याच्या बहिणीने प्रसंगावधान दाखवत तातडीने त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याला तत्काळ एमआयसीयू (मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट) मध्ये हलविण्यात आले. याठिकाणी एमआयसीयूचे प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पूजा तन्नीरवार, डॉ. विनय बुराडकर, डॉ. ललितकुमार, डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. आसावरी देशपांडे, डॉ. सौरभ मुळे, डॉ. तन्मय मेहता, डॉ. लुसी थॉमस या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने वेळ न दवडता उपचार सुरू केले.रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सात दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. या कालावधीत डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि तांत्रिक कर्मचारी यांनी अत्यंत दक्षतेने उपचार केले. योग्य औषधोपचार आणि सातत्यपूर्ण देखरेखीमुळे रुग्णाने हळूहळू प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. प्रकृतीत सुधारणा होताच त्याला व्हेंटीलेटरवरून काढण्यात आले आणि पुढील उपचार सुरू ठेवण्यात आले.सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे. या यशस्वी उपचारामुळे कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

मानसिक तणाव, एकटेपणा आणि व्यसनाधीनता यामुळे अनेक तरुण टोकाचे निर्णय घेतात. अशा वेळी कुटुंबीयांनी वेळेत लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे असते. या प्रकरणात बहिणीने दाखवलेली तत्परता रुग्णाचा जीव वाचवण्यात निर्णायक ठरली. योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाल्यास गंभीर अवस्थेतूनही रुग्णाला वाचवता येते. कुटुंबीयांनी संवाद वाढवणे, भावनिक आधार देणे आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ टीमने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि कुटुंबीयांच्या जागरूकतेमुळे एका तरुणाला नवजीवन मिळाले आहे.
– डॉ. ललितकुमार, निवासी डॉ.उल्हास पाटील रूग्णालय

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.