शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गोड आणि आनंदाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विविध प्रसारमाध्यांनी याबाबतचे वृत्त प्रदर्शित केले आहे. माहितीनुसार, राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधुम सुरु आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या कारणास्तव आचारसंहिता लागू आहे. यामुळे या निर्णयाची आज घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. याबाबत अधिकृत घोषणा सध्या होणार नसल्याची माहिती आहे. पण लवकरच याबाबत घोषणा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, जवळपास 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त आहे. पण याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात येणार नसल्याची माहिती आहे.
खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. पण सध्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार नसल्याची माहिती आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे. या कर्जमाफीचा राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले इतर निर्णय
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता. रस्त्यांच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला दोन्ही बँकाकडून मिळणार प्रत्येकी 8 हजार 700 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार.
हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई. किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, मुंबई. श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई. ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार.