जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावरून एक कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता घडली.
प्राथमिक माहितीनुसार, कारमधील सर्वजण मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. दरम्यान, भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती थेट दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चालक व एक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून क्रेनच्या सहाय्याने ती बाहेर काढण्यात आली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.