जळगावचे प्रवीण ठाकरे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी सहाय्यक पंच
दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ महासंग्रामात ८० पेक्षा जास्त देशांचा सहभाग असून, २०६ खेळाडू अधिकृतरित्या खेळणार आहेत. खुल्या गटातील या स्पर्धेत बाद फेरीचा अवलंब केला जात असल्याने अतिशय उत्कंठावर्धक व रोमहर्षक सामने अनुभवण्याची संधी बुद्धिबळ प्रेमींना लाभत असते. भारताकडून डी गुकेश, प्रग्नानंदा, अर्जुन इरिगेसी, विदित गुजराथी, अरविंद चिदंबरम, दिव्या देशमुख सारखे कसलेले खेळाडू सहभागी होत असून जगभरातून अनिश गिरी, वेस्ली सो, नोदरबेक अब्दुसत्तारोव,इयान नेपोमियाशी, व्हिन्सेंट केमर, लियोन आरोनियन यांसारखे दिग्गज व अनुभवी खेळाडू देखील या स्पर्धेत आपले कसब पणाला लावतील.
जगातील सर्वोत्तम २०६ बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व नियुक्त केलेले पंच या सर्वांची चोख व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व गोवा शासनाने केली आहे. या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या जळगाव जिल्ह्यातील व्यक्तीस हा बहुमान प्राप्त व्हावा, ही महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेमींसाठी खचितच अभिमानास्पद बाब आहे.
या त्यांच्या यशासाठी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील, नरेंद्र पाटील, संजय पाटील, यशवंत देसले, तेजस तायडे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
