शेतकरी संघाच्या निवडणुकीत भाजप प्रणित ‘सहकार पॅनल’चा १६ जागांवर विजय
यावल : प्रतिनिधी
यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित ‘सहकार पॅनल’ने मंत्री गिरीश महाजन यांच्या व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नियोजनबद्ध प्रचार निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आ.शिरीष चौधरी) आणि महाविकास आघाडी प्रणित ‘शेतकरी विकास पॅनल’चा दारुण पराभव झाला. पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यावलचे तालुकाध्यक्ष तथा विद्यमान संचालक प्रभाकर सोनवणे, चेअरमन अमोल भिरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देवकांत पाटील, नीलिमा चेतन किरंगे, अनिता हेमंत येवले, सतीश हरिचंद्र पाटील यांचा पराभव कशामुळे झाला, याबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे.
![](https://edivyasarthi.com/wp-content/uploads/2021/10/GRF-Ad-100X100-mm-pdf.png)
पंचवार्षिक निवडणुकीत १७ जागांपैकी १६ जागांवर भाजप-शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी रिपाई आठवले गट प्रणित सहकारी पॅनलने दणदणीत विजय प्राप्त करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलचा दारुण पराभव केला. त्यांच्या राजकारणाचे १२ वाजविले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक अतुल वसंतराव पाटील यांच्या माध्यमातून व त्यांच्या स्वतःच्या कौशल्यावर महाविकास आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यात मात्र महाविकास आघाडीचा गड गेला (प्रभाकर सोनवणे यांच्या माध्यमातून) पण सिंह आला अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.
भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) रिपाई आठवले गट प्रणित सहकार पॅनलने १७ पैकी १६ जागा जरी प्राप्त केल्या असल्या तरी महाविकास आघाडी प्रणित शेतकरी पॅनलचे एकमेव निवडून आलेले संचालक तथा यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांच्या बौद्धिक व राजकीय कौशल्यामुळे १६ नवनिर्वाचित संचालकांना शेतकी संघात काही निर्णय घेताना चांगलाच संघर्ष करावा लागणार असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.
यावल तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत महायुतीचे नारायण शशिकांत चौधरी हे एक प्रबळ आणि समर्थ उमेदवार प्रचार रणधुमाळीच्या आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १६ जागांसाठी रविवारी, ४ रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यात महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास आणि महायुतीचे सहकार या दोन्ही पॅनलचे ३२ इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी माध्यमिक कन्या शाळेत व्यक्तीशः मतदारसंघात ६६ टक्के मतदान झाले होते. २ हजार ८२५ पैकी १ हजार ८६९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
येथील महर्षी श्री व्यास महर्षी मंदिराच्या सभागृहात सोमवारी, ५ फेब्रुवारी रोजी मतमोजणीस सुरूवात झाली. त्यात महायुतीने पहिल्यापासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे येथील मविआ प्रणित पॅनलची सत्ता जाऊन महायुतीचे पॅनल सत्तारूढ झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे सहकारी पॅनलच्या १५ आणि यापूर्वी एक जागा बिनविरोध झाल्याने त्यांच्या १६ जागा निवडून आल्या आहेत. विरोधकांमध्ये केवळ माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा बौद्धिक व राजकीय कौशल्यावर विजय झाला आहे. इतर संचालकांना संधी का मिळाली नाही..? त्याचे राजकीय, सामाजिक संशोधन करणे गरजेचे आहे अन्य काही उमेदवारांचा दारूण पराभव का? झाला त्याचेही आत्मचिंतन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे.
अतुल पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी विजय
आजच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने सर्व जागांवर विजय मिळविला असला तरी मविआच्या पॅनलचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील यांनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळविला तर शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट
महाविकास आघाडीच्या पॅनलसाठी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, आ. शिरीष चौधरी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अतुल पाटील आदी मान्यवरांनी केलेले प्रयत्न फोल ठरले. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून मविआला जबरदस्त धक्का दिला आहे. त्यातून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे चित्रही स्पष्ट झाल्याचे यावल, रावेर तालुक्यात चर्चिले जात आहे.
यावल तालुक्यात अजित पवार गटाने उघडले खाते
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि यावल तालुका शेतकरी संघाचे माजी संचालक प्रशांत लीलाधर चौधरी यांच्या माध्यमातून यावल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सहकार क्षेत्रात खाते उघडले आहे. त्यामुळे सोयीनुसार राजकारण करणारे आणि तळ्यात-मळ्यात उडी मारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना मोठी चपराक बसली आहे.