टपरीच्या वादातून दुकानदाराला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
धरणगाव : रस्त्यालगत असलेली दुकानाची टपरी काढून टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केल्याची घटना सोमवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे घडली. या प्रकरणी बुधवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चमगाव येथील प्रवीण मांगो पाटील (वय ४८) हे कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांचे गावातील मुख्य रस्त्यालगत दुकान आहे. सोमवारी सायंकाळी संशयित आरोपी राजेंद्र बाळकृष्ण सावंत, दिगंबर बाळकृष्ण सावंत, विजय संजय सावंत आणि चंद्रभान भागवत कोळी (सर्व रा. चमगाव) यांनी त्यांना मढीभागात बोलावून घेतले.

“रस्त्यालगतची टपरी का काढत नाहीस?” असा जाब विचारत आरोपींनी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एकाने रस्त्यावरील काठीने प्रवीण पाटील यांना मारहाण करून जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
प्रवीण पाटील यांच्या तक्रारीवरून संबंधित चौघांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे करीत आहेत.