DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

धुळे :  साने गुरुजींचे, विनोबा भावे, करुणामय विचार, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षणधर्म आणि गाडगेबाबांच्या समाजप्रबोधनाच्या परंपरेने ही भूमी सतत प्रेरणादायी ठरली आहे. अशा या थोरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आयोजित पुरस्कार सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनने या भूमीशी जोडला गेलेला सन्मान हा केवळ पुरस्कारार्थींसाठी गौरवाचा क्षण नसून, त्यांच्या कार्याला मिळालेली एक मोठी पावती आहे, असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक रमेश दाणे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विज्ञान समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कर ” बर्वे छात्रालय धुळे उत्साहात संपन्न झाला. व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे, नगरसेविका स्थायी समिती सभापती बालीबेन मंडोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश दाणे, वक्ते शंभू पाटील आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन उपस्थित होते.

आरंभी नाझनीन शेख यांनी ‘वैष्णव जनतो तेने कहिये जे’  गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैभव जोशी यांनी केले. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा परिचय जगदीश देवपूरकर यांनी करून दिला.
‘महात्मा गांधी आणि अहिंसा’ या विषयावर शंभू पाटील यांनी  व्याख्यान दिले. सध्याच्या परिस्थितीत युद्धजन्य परिस्थितीत गांधीजी आणि अहिंसा हा विषय चेष्टेचा ठरू पाहतोय. आधुनिक काळात महात्मा गांधी यांनी गौतम बुद्ध आणि महावीर यांच्या विसरलेल्या अहिंसेची पुन्हा मांडणी केली. डॉ. भवरलाल भाऊ यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन स्थापना करून नव्या पिढीसाठी गांधी आणि अहिंसेचे विचार पोहोचविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे असे प्रतिपादन केले. रामधीरजजी यांच्या सन्मानपत्राचे वाचन कल्पतेश देशमुख यांनी केले.

ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ते माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना रामधीरजजी म्हणाले की,
आजच्या काळात सुरू असलेल्या युद्धांबद्दल गंभीर नैतिक प्रश्न उपस्थित होतात. एका लोकशाही देशाच्या निवडून आलेल्या नेतृत्वावर दुसऱ्या देशाने हस्तक्षेप करणे हे मानवतेच्या आणि आंतरराष्ट्रीय न्यायाच्या विरोधात आहे, अशी तीव्र भावना व्यक्त होते. सामान्य जनतेच्या करातून मिळालेला पैसा विकास, शिक्षण आणि कल्याणासाठी वापरला जाण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांवर खर्च केला जातो, ही मोठी विसंगती आहे. इतिहासात पाहिले तरी शेवटी युद्धांचे परिणाम संवाद आणि समझोत्यातच होतात, मग सुरुवातीपासूनच शांततेचा मार्ग का स्वीकारला जात नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.
सूत्रसंचालन वैद्य विजय कळमकर यांनी तर आभारप्रदर्शन वैद्य अपश्चिम बरंठ यांनी केले.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.