अरबी समुद्रात भारताचा दमदार डाव; पाकिस्तानची गुप्त क्षेपणास्त्र योजना हाणून पाडली
‘आयएनएस ध्रुव’ची तैनाती; पाकिस्तानच्या हालचालींवर भारताची बारकाईने नजर
नवी दिल्ली : अरबी समुद्रात भारताने पाकिस्तानच्या संशयास्पद लष्करी हालचालींना ठोस प्रत्युत्तर देत त्यांची संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी हाणून पाडल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान गुप्त क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत असतानाच भारतीय नौदलाने अत्याधुनिक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग प्रणालीने सुसज्ज ‘आयएनएस ध्रुव’ ही युद्धनौका समुद्रात तैनात केली.
पाकिस्तानकडून १४ आणि १५ एप्रिलदरम्यान कराची, ओरमारा, ग्वादर आणि सोनमियानी या किनारपट्टीलगतच्या सागरी क्षेत्रात ‘नोटीस टू एअरमेन’ (NOTAM) जारी करण्यात आला होता. सुमारे ४१५ ते ४५० किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता. अशा प्रकारचा इशारा साधारणपणे क्षेपणास्त्र किंवा लष्करी चाचणीपूर्वी दिला जातो.

या हालचालींचा अंदाज घेत भारतीय नौदलाने तातडीने रणनीती आखत पाकिस्तानच्या जाहीर वेळेच्या २४ तास आधीच, म्हणजे १३ एप्रिल रोजी ‘आयएनएस ध्रुव’ अरबी समुद्रात पाठवली. ही युद्धनौका शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास आणि त्यांच्या हालचालींवर अचूक नजर ठेवण्यास सक्षम आहे.
दरम्यान, पाकिस्तान नेमके कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र डागणार होता, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, संरक्षण तज्ज्ञांच्या मते, ही चाचणी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची किंवा समुद्रातून डागल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रणालीची असू शकते.