DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

जळगाव – अऩुभूती निवासी स्कूलचा आयसीएसई बोर्ड (दहावी) च्या परीक्षेत पलक सुराना ९६.८० टक्के गुण प्राप्त करून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे आईइससी (बारावी) च्या परीक्षेत अलेफिया शाकीर कुझेमा ही ९२.७५ टक्के मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. १० व १२ व्या इयत्तेचा निकाल आज 30 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत सलग १९ वर्षांची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे. ही इ. १० वी ची १६ वी तर इ. १२ वी ची १४ वी बॅच होती. या दोन्ही परिक्षांमध्ये उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अनुभूती स्कूलच्या व्यवस्थापनाने अभिनंदन केले आहे.

आयसीएसई (दहावी) मध्ये एकूण 32 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात स्वयंम पाडे ९५.६० गुण मिळवून द्वितीय आणि कु. स्तुती गर्ग ९४.८० गुण मिळवून तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या शिवाय ९० टक्क्यांच्यावर एकूण ८ विद्यार्थी तर ८० ते ९० टक्क्यांदरम्यान १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. खानदेशात सीआयसीएसई पॅटर्नची पहिली शाळा म्हणून या संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये परस्परांतील सहकार्य वाढावे, उद्योजक वृत्ती फुलावी यासाठी अनेक दर्जेदार उपक्रम राबविले जातात. छंद जोपासण्याची संधी देणाऱ्या वर्षभर चालणाऱ्या स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये विद्यार्थी आपली कला, कौशल्य आणि आत्मविश्वास दाखवत यश संपादन करतात. अनुभूती निवासी स्कूल ही भविष्याशी निगडीत अनुभवाधारीत शिक्षण देणारी स्कूल आहे. .

दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकालात ट्विंकल प्रकाश ललवाणी ९१.७५ गुण मिळवून द्वितीय तर आर्यमान बोथरा ८९.७५ टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर बाकी सर्वच विशेष प्रावीण्याचे गुण मिळवून घवघवीत यश त्यांनी संपादन केले. इंग्रजी, अकौंटस्, कॉमर्स, इकोनॉमिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ या सर्व विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविलेले आहेत. या परीक्षेसाठी एकूण १७ विद्यार्थी बसले होते.

भविष्याचे वेध घेताना शैक्षणिक अभ्यासक्रमासह सूप्त कलागुणांना जोपासण्याची संधी विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या साधली आहे. गुणवत्तेच्या आधारे त्यांनी मिळवलेले यश केवळ शाळेचा नव्हे तर संपूर्ण कान्हदेशाचा अभिमान ठरले आहे.विद्यार्थ्यांच्या या कामगिरीने शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असून, पुढील पिढीला प्रेरणा देणारा हा प्रवास अधिक उज्ज्वल होणार आहे. या यशामागे विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचा मोलाचा सहभाग आहे हे तर निर्विवाद सत्य आहे. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन त्याच प्रमाणे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, तसेच प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

“स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक मूल्ये जपणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलची स्थापना २००७ मध्ये केली. स्थापनेपासूनच या संस्थेने उत्कृष्टतेचा ध्यास घेतला, यंदाही विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेचा लौकिक अधिक उजळविलेला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ शैक्षणिक गुणवत्तेचे द्योतक नाही, तर त्यांच्या सृजनशीलतेचे, मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचेही प्रतीक होय. या सुयशाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर सहकारी तसेच पालकांचे अभिनंदन आहे. निसर्गरम्य वातावरणात घडणारे हे विद्यार्थी स्पर्धात्मक जगाशी सामना करण्याची शक्ती आणि क्षमता बाळगतात. देशाचे उज्ज्वल भविष्य अशा सूज्ञ विद्यार्थ्यांच्या हातात आहे, आणि अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली कामगिरी याची खात्री पटवते. सर्व गुणवत्त विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.