राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार
जळगाव – नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील हवामान सतत बदलत आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र या भागात किमान तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून पहाटे आणि रात्री तीव्र थंडी जाणवू शकते. विभागाच्या माहितीनुसार, काही भागांत तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे.
जळगावमध्ये तापमानात घट
दरम्यान, जळगाव येथे रविवारी किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. सोमवारी तापमानात घसरण होऊन रात्रीचे किमान तापमान ११.८ अंशांपर्यंत खाली आले, तर दिवसाचे कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस इतके होते. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहेत. दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका जाणवतो, तर सकाळी आणि सायंकाळी गारठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत थंडीचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
