DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा आजपासून

जळगाव | प्रतिनिधी 

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. 30 जानेवारी रोजी सकाळी ७.00 वाजेला गांधी तिर्थ  येथून ) गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित “ग्राम संवाद सायकल यात्रे”ची आजपासून सुरुवात होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते सायकल यात्रेस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात होणार असून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

 

ग्राम संवाद सायकल यात्रा १३ दिवस चालणार असून जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातून सुमारे ३५० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक अशा ३० स्वयंसेवकांचा सहभाग निश्चित झाला आहे. ९ वर्षाचा नीर झाला व ७८ वर्षीय अब्दुलभाई तसेच अमेरिकेतील मारिया यांचा यात्रेत समावेश असणार आहे.

यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने तयार करण्यात आलेली प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. तसेच निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा, व्याख्यान, खेळ, नाट्य व पपेट शोचा वापर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांची सांगता प्रतिज्ञेने होणार आहे. विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.