DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खोट्या मेसेजला बळी न पडता सावध राहावे -महावितरण

जळगांव ;- महावितरणच्या जळगांव परिमंडलात जळगांवसह धुळे आणि नंदुरबार या ग्रामीण जिल्ह्यांचा समावेश होतो. ग्रामीण भागातील लोक सोशल मिडीयावरील फ़सव्या संदेशांना लवकर आणि सहज बळी पडतात असे गृहित धरुन अलीकडे काही ठग सोशल मिडिया वरुन खोटे मेसेज पाठवून वीज ग्राहकांच्या फ़सवणूकीचे प्रयत्न करीत असल्याचे निदर्शानास येत आहे. वीज ग्राहकांनी तशा फ़सव्या मेसेजेसना बळी न पडता सावध राहण्याचे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

वीज ग्राहकांना फ़ोन वरुन मेसेजेस, इतर सोशल मिडियावरुन संदेश पाठवून, वीज पुरवठा खंडित करण्याचा तपशील कळवून, ग्राहकांचा बॅंकीग डेटा जमा करुन फ़सवणूक केली जाते. त्याची दखल घेत महावितरणकडून वेळोवेळी वीज ग्राहकांना सतर्कही केले जाते.

 

मागील महिन्याचे वीजबिल अपडेट करण्याचे सांगून किंवा तसे न केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचे फ़्रॉडर्सकडून सांगीतले जाते. वीज पुरवठा खंडित न करण्यासाठी मॅसेजमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचेही कळविले जाते. तसेच त्याव्दारे वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून वीज ग्राहकांना सॉफ़्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करुन ग्राहकांच्या बॅंक खात्यातील रक्कम फ़्रॉडर्स काडून घेतात. त्यातून ग्राहकांची फ़सवणूक होते. अशी फ़सवणूक न होण्यासाठी वीज ग्राहकांनी फ़सव्या संदेशापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.

वस्तुतः महावितरणकडून अथवा कोणत्याही किंवा कुणाच्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन अशा प्रकारचे एसएमएस व व्हॉटसअॅप मेसेज तसेच ई-मेल पाठविण्यात येत नाहीत. शिवाय, महावितरणकडून वीज बिलासाठी रात्रीच्या वेळेस कधीच वीज पुरवठा खंडित केला जात नाही. हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे. असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

फ़सव्या संदेशाबाबत किंवा शंकास्पद संदेशाबाबत वीज ग्राहकांच्या तक्रारी असतील तर 24 तास सुरु असलेल्या 1800212 3435, 1800233 3435 आणि 1912 या टोल फ़्री क्रमांकावर किंवा जवळच्या महावितरण कर्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय cybercrime.gov.in वरही तक्रार नोंदविता येईल असे महावितरणतर्फ़े कळविण्यात येत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.