DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पतंग उडवताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

 

धरणगाव : प्रतिनिधी

 

एकीकडे सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा होत असताना धरणगाव तालुक्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे ही घटना घडली. मूळचे अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील रहिवासी तर सध्या धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे राहत असलेल्या संजय महाजन यांच्या दहा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाला.

मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त हिंगोणा येथे स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी) हा बालक आज पतंग उडवत होता. मात्र, पंतग उडवताना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. अक्षय माळी हा पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच लगेच त्याला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालविली होती.

आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि, यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे. मुलांनी पतंग उडवतांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.